Top News

नगरकरांनो सावधान : जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा

 


अहमदनगर जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार दि. 31/08/2021 ते 01/09/2021 या कालावधीत अहमदनगर जिल्हयामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.

आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात 375.08 मि.मी., 83.79% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या ) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्हयातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

सखल भागात राहणा-या नागरीकांना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे.

नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुन ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते.

त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्या-या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये.

अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा.

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 वर संपर्क साधावा.

(web title: Nagarkarno caution: warning of heavy rains in the district)

Post a Comment

Previous Post Next Post